८९ वर्षीय ‘हे’ ज्येष्ठ समाजसेवक पुन्हा सरकारला नाकीनऊ आणणार...
माहितीचा अधिकार अधिनियम कठीण करण्याविरोधात पुन्हा मैदानात उतरणार
पुणे – राळेगणसिद्धीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्यासाठी २००५ मध्ये खूप मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला चांगलच वेठीस धरले होते. आता पुन्हा या सरकारला नाकीनऊ आणण्यासाठी अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत.
माहितीचा अधिकार कायदा नवीन नियमानुसार कठोर करण्यावरून ते आक्रमक झाले आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्र माहिती अधिकार नियम त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. नवे नियम रद्द न झाल्यास ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
"माहितीचा अधिकार हा शासनाचा उपकार नसून नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार कठीण करण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरेल." असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.