पाचगाव : योगेश्वरी कॉलनी येथे पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास घडली. गणेश कदम याने पत्नी दिपाली कदम हिच्यावर हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.दिपाली आणि गणेश यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समजते. आठ दिवसांपूर्वी पतीसोबत झालेल्या वादानंतर दिपाली शेजारीच असलेल्या माहेरी राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, रविवारी सकाळी दिपाली कपडे घेण्यासाठी गणेशच्या घरी आली होती. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यात गणेशने केलेल्या हल्ल्यात दिपाली गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा व पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे पाचगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
पतीने केला पत्नीचा खून, पाचगाव मधील घटना

August 16, 2026 / क्राईम

