कोल्हापूर – निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये एवढी भांडणे होत असतील, तर उद्या त्यांच्या हातात सत्ता गेल्यास काय परिस्थिती निर्माण होईल, याचा विचार दूध उत्पादकांनी करावा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी दुध उत्पादकांना केले आहे. ते आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत बोलत होते.
गेल्या सहा महिन्यांत गोकुळची झालेली बदनामी भरून काढायची असेल, तर महायुतीला बाजूला करण्याशिवाय पर्याय नाही, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी आ. सतेज पाटील यांनी म्हटले कि, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्येच आतापासून विरोध सुरू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ हतबल असून, महायुती सोडून ते काय करू शकतील असे वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला. महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असली, तरी आमचे १८ ते १९ उमेदवार निश्चित झाले असून, निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोकुळ ही शेतकऱ्यांची संस्था असल्याने तिला पक्षीय रंग देण्याऐवजी दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेणारे संचालक मंडळ असावे, अशी माझी भूमिका आहे. आम्ही समविचारी म्हणून भूमिका घेत आहोत. शेतकऱ्यांची संस्था पक्षविरहित असली पाहिजे.




