कोल्हापूर – राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रम अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी, विदयार्थ्यांनी इंटरनेटचा योग्य वापर करून वेळेचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बारा मिनिटांच्या रिल्स मूळ नव्या पिढीच जीवन बदलत चाललय विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कौशल्य विकसित करण्यासाठी इंटरनेटवरील मोफत कोर्सेस, पॉडकास्ट आणि चांगल्या लेखांचा वापर आत्मविकासाठी करावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी व्यक्त केले.
आजच्या काळात जितकी आव्हाने आहेत, तितक्याच संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. दररोज नवीन काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
याप्रसंगी अनिल म्हमाणे, संदीप जंगम, अतुल बांदिवडेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी असोसिएशलनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, संघराज जगतकार, सतीश मुसळे, सचिन खराडे, संजय सासणे, भगवान माने, अनिता काळे, संभाजी थोरात, महादेव चक्के, शिवाजी चौगले, सुभाष पाटील, रघुनाथ मुधाळे यांच्यासह विदयार्थी आणि पालक उपस्थित होते.




