आज श्री अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा 

<p>आज श्री अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा </p>

कोल्हापूर – आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची  महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा मांडण्यात आली आहे.  एकेकाळी रंभ नावाचा दैत्य भगवान शंकरांची उपासना करत होता. त्याने उपासना करून भगवान शंकरांना त्यांच्यासारखा पराक्रमी पुत्र द्या असे वरदान मागितले. त्याला अनुसरून भगवान शंकरांनी आपलाच एक अंश पुत्र रूपात प्रगट होईल असे वरदान दिले रंभाने तिथे असलेल्या महिशीमध्ये आपले तेज टाकले तेव्हा त्यातून उग्र असा महिषासुर प्रगट झाला. त्याने सर्व देवांचे सर्व अधिकार काढून घेतल्यानंतर पराजित झालेल्या देवांनी ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश आहेत अशा ठिकाणी जाण्याचे ठरवले. त्या वेळेला देवांवर झालेले अन्याय ऐकूण भगवान शिव विष्णू आणि ब्रह्मा यांच्या शरीरातून तेज बाहेर पडले. त्या तेजात सर्व देवांचे तेजही एकत्र झाले आणि तिथे सर्व दिशांची पोकळी व्यापणारी अशी एक तेजाची शलाका प्रगट झाली शंकराच्या तेजापासून देवीचे मुख तयार झाले, यमाच्या तेजापासून केस, विष्णूंच्या तेजापासून बाहू ,चंद्र तेजापासून वक्षस्थळ, इंद्रदेव पासून तिचे मध्य शरीर वरूण तेजापासून तीच्या पोटऱ्या आणि मांड्या, पृथ्वी तेजापासून नितंब, ब्रह्म तेजापासून पाय, सूर्य तेजापासून पायाची बोटं, वसु तेजा पासून हाताची बोटं, कुबेराच्या तेजापासून नाक, दक्ष प्रजापतीच्या तेजापासून दात, दोन्ही संध्यांच्या तेजातून भुवया, वायूच्या तेजापासून तिचे कान तयार झाले अशा या देवीला सर्व देवांनी आपापली शस्त्र दिली शंकराने त्रिशूल ,विष्णूने चक्र ,वरूणाने शंख, अग्नीने शक्ती, वायुने धनुष्यबाण भाता,इंद्राने वज्र ऐरावताची घंटा यमाचा दंड ,वरूणाने पाश प्रजापतीची अक्षमाला ,ब्रह्मदेवाने कमंडलू, सूर्याने रोमरोमातील तेज मृत्यूने ढाल आणि खडग क्षीरसागराने तिला शुभ्र हार आणि कधी न मळणारी वस्त्रं, किरीट कुंडल चंद्र आणि बाजूबंद दिले विश्वकर्माने तिला परशू दिला समुद्राने दोन फुलमाला दिल्या तसेच हातात धारण करण्यासाठी कमळ दिले. हिमालयाने सिंह व रत्नागिरी कुबेराने तिला पानपात्र दिले . शेषनागाने तिला नागहार दिला. अशा त्या पराक्रमी देवीला पाहून महिषासुर कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये धावत आला आणि त्याने तिच्याशी युद्ध सुरू केले देवी आणि तिच्या सिंहाने महिषासुराच्या सर्व सैन्याला मारताच महिषासुर धावत आला. त्याने देवीला त्रस्त करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तो रेड्याच्या शरीरात असताना देवीने त्याचे मस्तक उडवले व त्यातून अर्धा बाहेर आलेल्या महिषासुराला मारण्यासाठी दिले रेड्याच्या पाठीवर पाय ठेवला व शरीरातून बाहेर आलेल्या महिषासुराचे मस्तक उडवण्यासाठी त्रिशूलाने घाव घातला आज या स्वरूपात करवीर निवासिनी विराजमान आहे.