महानगरपालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी विमानातून भरारी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची अनोखी संधी देण्यात आली असून आज हे विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना झाले.
प्रशासक तथा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबवण्यात येत आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थेला भेट देण्याची संधी देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
आज दुपारी महानगरपालिका मुख्य इमारत चौक येथून के.एम.टी. बसद्वारे विद्यार्थ्यांना विमानतळाकडे रवाना करण्यात आले. यावेळी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अभ्यासात सातत्य ठेवून शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी बनून देशाचे सक्षम नागरिक होण्याचे आवाहन केले. भविष्यातही गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इस्रोसारख्या संस्थांच्या अभ्यास सहली सातत्याने आयोजित केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या अभ्यास सहलीत एकूण २५ विद्यार्थी (१३ मुले व १२ मुली), दोन मार्गदर्शक शिक्षक, एक शिक्षिका अधिकारी व एक महिला डॉक्टर असा एकूण २९ जणांचा सहभाग आहे. विद्यार्थ्यांचा विमान प्रवास, इस्रोतील निवास व्यवस्था व परतीच्या प्रवासाचे नियोजन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर व उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी केले आहे.
सहलीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे ब्लेझर व बूट मोफत देण्यात आले. अग्निशमन विभागामार्फत खाऊ वाटप करण्यात आले असून शिक्षक संघटनेमार्फत बॅग व नोटपॅडसारख्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, लिपिक संजय शिंदे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव व शांताराम सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.