कागलच्या मल्लांचा महाराष्ट्र केसरीत दमदार जलवा...
७ पैलवानांची दमदार कामगिरी
कोल्हापूर - पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या कुस्ती स्पर्धेत कागल तालुक्यातील बानगेमधील जय भवानी तालमीच्या मल्लांनी घवघवीत यश संपादन करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत अभिषेक कापडे आणि वैभव पाटील यांनी सुवर्णपदक पटकावत बुलेट गाडीचा मान मिळवला आहे. साताप्पा हिरुगडे आणि अजय कापडे हे रौप्यपदक मिळवत स्प्लेंडर गाडीचे मानकरी ठरलेत तर ऋषी पाटील, निलेश हिरुगडे आणि अमोल बोगार्डे यांनी कांस्यपदक जिंकत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. बानगेच्या एकूण ७ मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशामागे उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे, वस्ताद भाऊ सावंत, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक आकाश नलवडे आणि वैभव तेली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.