मनपा भष्टाचाराचा तपास अतिरिक्त पोलीस अधिक्षकांकडे द्या...
ठाकरे गटाचे जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेत ठराविक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैशाच्या टक्केवारीतून मोठा भष्टाचार केला आहे. असा आरोप ठेकेदार प्रसाद संजय वराळे यांनी पुराव्यानिशी केला आहे. हा भष्टाचार म्हणजे जनतेच्या पैशाची अधिकाराचा गैरवापर करून वारे माप लूट केल्यासारखी आहे. त्यामुळे या गंभीर भ्रष्टाचाराची तपासणी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांमार्फत व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे आणि उपनेते संजय पवार यांनी पत्राद्वारे जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे.
त्यांनी पत्रात म्हटले आहे कि, “सरकारी पैशाचा दुरुपयोग करणे व कामासाठी पैशाची देवाण -घेवाण करणे ही गंभीर बाब असून संबंधितांवर कठोर शासन झालेच पाहिजे या सर्व प्रकरणांमध्ये तपासाबाबत काही राजकीय मंडळी व संबंधित अधिकारी आपली निर्दोष सुटका होण्यासाठी दबाव आणू शकतात याची आम्हाला शंका आहे. याबाबत फक्त ठेकेदारांवर गुन्हा दाखल न करता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होणे गरजेचे होते कारण ठेकेदार प्रसाद संजय वराळे यांनी केलेले आरोप गंभीर आहे. करदात्यांना न्याय द्यायचा असेल तर आपणास नम्र विनंती आहे की, हा संपूर्ण तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे द्यावा तर आणि तरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकते.”