नागरी विमान वाहतूक मंत्रालय : भारतीय विमान कंपन्यांची १ हजार २२१ उड्डाणे तर परदेशी कंपन्यांची ३८८ उड्डाणे रद्द
नवी दिल्ली – सध्या इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे आशियातील काही भागांमधील हवाई क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालय पश्चिम आशियातील काही भागांमधील हवाई क्षेत्राच्या बदलत्या परिस्थितीवर आणि आंतरराष्ट्रीय विमान संचालनावर होणाऱ्या परिणामांवर सतत लक्ष ठेवून आहे. आजवर, चालू परिस्थितीमुळे भारतीय विमान कंपन्यांची १ हजार २२१ उड्डाणे आणि परदेशी विमान कंपन्यांची ३८८ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्या वेळापत्रकात मोजके बदल केले आहेत. लांब पल्ल्याची आणि अति-लांब पल्ल्याची उड्डाणे प्रतिबंधित हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्गांद्वारे टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केली जात आहेत.
अडकलेल्या प्रवाशांच्या प्रवासासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. विमान कंपन्या गरजेनुसार अतिरिक्त विमाने तैनात करत आहेत आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी परदेशी विमान वाहतूक प्राधिकरणे व परदेशातील भारतीय दूतावासांशी जवळून समन्वय साधला जात आहे. आज भारतीय कंपन्यांतर्फे एकूण २४ उड्डाणे चालवली जात आहेत. या व्यतिरिक्त, एमिरेट्स (Emirates) आणि एतिहाद (Etihad) ने गेल्या २४ तासांत खाडी देशांमधून ९ उड्डाणे चालवली आहेत.
भारतीय विमान कंपन्या ४ मार्च रोजी आणखी ५८ उड्डाणांचे नियोजन करत आहेत, ज्यामध्ये इंडिगोची (IndiGo) ३० आणि एअर इंडिया (Air India) व एअर इंडिया एक्सप्रेसची २३ उड्डाणे समाविष्ट आहेत. भारत आणि खाडी देशांदरम्यान चालणाऱ्या परदेशी विमान कंपन्या देखील मर्यादित सेवा देत आहेत.
प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च आहे. सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांशी पारदर्शक संवाद राखण्याचा आणि परतावा (Refund), पुनर्गठन (Rescheduling) आणि प्रवासी सहाय्याबाबतच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मंत्रालय विमान कंपन्यांच्या सतत संपर्कात असून या काळात विमान तिकिटांच्या दरात अवाजवी वाढ होणार नाही याची खात्री करण्यासाठी विमान भाड्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून थेट उड्डाणाची ताजी स्थिती तपासून घेण्याचा आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सुरक्षित ऑपरेशन्स, सेवांची व्यवस्थित पुनर्स्थापना आणि बाधित प्रवाशांना सुविधा मिळावी यासाठी मंत्रालय विमान कंपन्या, विमानतळ चालक, नियामक प्राधिकरणे आणि परराष्ट्र मंत्रालयाशी सतत समन्वय साधत आहे. पुढील अपडेट्स आवश्यकतेनुसार जारी केले जाईल, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.