गुणवत्तापूर्ण आणि परिणामाधारित शिक्षणासाठी एआयचा प्रभावी वापर आवश्यक — डॉ. शंकर मंथा

<p>गुणवत्तापूर्ण आणि परिणामाधारित शिक्षणासाठी एआयचा प्रभावी वापर आवश्यक — डॉ. शंकर मंथा</p>

कोल्हापूर - कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे केवळ तांत्रिक प्रगतीचे साधन नाही, तर शिक्षणाच्या परिणामकारकतेसाठी आणि गुणवत्तेसाठीचे एक शक्तिशाली माध्यम असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम शिक्षण तज्ञ, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष आणि नागपूर येथील रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शंकर मंथा यांनी केले. 

डी. वाय. पाटील  अभिमत विद्यापीठ कोल्हापूर येथे आज सोमवारी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरावर आधारित दोन विशेष तज्ज्ञ व्याख्याने पार पडली. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्यूएसी) वतीने या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मार्गदर्शन करताना डॉ मंथा यांनी शिक्षण क्षेत्रातील एआयच्या प्रभावी वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालिका डॉ. शिंपा शर्मा, प्रा. डॉ. अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

‘आउटकम बेस्ड एज्युकेशनमध्ये एआयचा वापर’ याविषयावर मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण शिक्षण व असमानता कमी करणे या उद्दिष्टांवर चर्चा झाली. यावेळी डॉ मंथा म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ तांत्रिक प्रगतीचे साधन नाही, तर शिक्षणाच्या परिणामकारकतेसाठी एक शक्तिशाली माध्यम आहे. एआयचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक समज व एकदार प्रवासाचे अचूकपणे मोजमाप करता येते. एआयच्या माध्यमातून हे शिक्षण अधिक वैयक्तिक, विश्लेषणाधारित आणि परिणामाभिमुख बनवते.

‘क्वालिटी अशुरन्समध्ये एआयचा वापर’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात डॉ मंथा यांनी रोजगारक्षम विकास आणि संस्थात्मक पारदर्शकता यावर भर दिला. ते म्हणाले, एआयच्या वापरामुळे शिक्षण संस्थांमधील पारदर्शकता, निर्णयप्रक्रिया आणि कार्यक्षमता वाढते. यावेळी डॉ. मंथा यांनी उपस्थितांच्या प्रश्नाना उत्तरे दिली. 

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणाच्या प्रत्येक घटकाला नवीन दिशा देत आहे. आमच्या विद्यापिठातही एआयच्या वापरावर भर दिला जात आहे. 

आयक्यूएसी संचालिका डॉ. शिंपा शर्मा म्हणाल्या, आउटकम बेस्ड एज्युकेशन आणि क्वालिटी अशुरन्समध्ये एआयचा वापर हा शिक्षण संस्थांच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

या दोन्ही कार्यक्रमांना विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.