राधानगरीतील गौरी टेक परिसरात आग...
शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान...
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील सिरसे आमजाई व्हरवडे हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळील गौरी टेक परिसरात अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीत आमजाई व्हरवडेमधील शेतकरी सुधीर राघो वरुटे यांच्या वैरणीचे पिंजर, गवत, शाळू आणि नाचणी काड्याच्या तब्बल पाच गंजी जळून खाक झाल्या. आमजाई व्हरवडेमधील अमित सुधीर वरुटे यांचे भात मळणीचे मशीन आणि दोन ट्रॉलींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी भोगावती कारखान्याचा अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. आगीचे कारण अस्पष्ट आहे.